कॅंटिनच्या तपकिरी चहाचा तो उग्र दर्प
अन चहावाढपी चंदूच्या नवनव्या हेयरस्टाईल्स.
माझ्या त्यावर नाना कोट्या
ॠषभच्या असायन्मेण्ट्स अन पसरलेल्या फाईल्स.
डोळे बंद केल्यावर सारं लख्ख दिसतं
अन पुन्हा डोळे उघडायचं मन होत नाही.
पुढ्यात चहा अन कोरे कागद असले तरी
मित्रांच्या घोळक्याविना ते आनंद देत नाहीत.
दाराशी जमलेल्या गर्दीतून वाट काढत येणारा सागर
अन नव्या मुलीला न्याहाळत त्याच्या प्रशस्तीच्या तऱ्हा.
नादिराचा मोबाईल फोनवरील दिनक्रम
अन गचाळ आनंदच्या शर्टावर अपरीट चरा.
आज मोबाईल वर व्यावसायिक दिनक्रम जातो
पण नादिराशी बोलणं होत नाही.
नव नव्या मुली भोवती असूनही त्यांची
प्रशस्ती सागरशिवाय मनी येत नाही.
शेवटच्या बेन्चशी झालेली चार वर्षांची सलग लगट
अन उशीरा येताच मित्रांना वेधायचं.
तीन जणांच्या बाकावर चारांची जेमेतेम सोय
प्रोफ.च्या आड चोरून मित्रांना ग्रुप मेसेजिंग करायचं.
आज ऑफिसाताल्या प्रशस्त क्युबिकल मध्ये
इमेल फॉरवर्ड करतो पण ग्रुप मेसेजिंग होत नाही.
एसेमेस च्या मागे गेलेल्या त्या एका रूपयाची किंमत
महिनाखेरीच्या तीस हजारातही जात नाही.
सेमिस्टरएक्झाम मग दणक्यात यायची
मित्रांच्या मस्तीला फूट पाडायची.
अभ्यासासाठीचा महिना असाच मग
परीक्षेस न जुमानत, मजेत काढायचा,
अन सबमिशनचं भूत मागे लागताच
लिहून लिहून फाईल्सचा खलिता भरायचा.
राहिलेल्या दिवसांतली मग तुटपुंजी
शेवटच्या आठवड्याची तयारी
त्यातही मग परीक्षेच्या
आदल्या रात्रीची केलेली नाईट वारी
आजही कामासाठी रात्र जागतो पण
त्यास मित्रांची साथ मिळत नाही,
जागून जागून केलेल्या अभ्यासाचं ते
मिडनाईट ऑईल मात्र जळत नाही.
मग सत्र परीक्षा अशीच जायची
निकाल घेऊन दणक्यात परतायची
निकालाच्या आधीची चिंता सतावायची
मग युनिव्हर्सिटीची फेरीही मारायची.
ताणतणावाचा नेल बायटींग ठाव
प्रत्येकाच्या ठायी दिसायचा
नादिराचा फोन, रंगील्या सागरचा मिजास
त्या कोऱ्या रीझल्ट बोर्डाशी हरायचा.
निकाल लागताच स्वतः आधी
मित्रांचीही श्रेणी पाहायची
ॠषभ आनंदशी फर्स्ट क्लासची ट्रीट मागत
सागरला पुढल्या केटीची रीत सांगायची.
शेवटची सत्रपरीक्षाही नेहेमीसारखी यायची
निकालबोर्डाशी अशीच गर्दी जमवायची
पण पुढल्या सत्राची पोकळी लक्षात येताच
डोळ्यातली पोकळी मात्र पाणवायची.
उच्च शिक्षण, नोकरी, करीयर यांचा ओझी
क्षणात डोक्यावर जाणवायची
अन त्याच ओझ्याखाली वाकलेल्या
सॅग, ॠषी, नॅड्झ अन ऍण्डीवरही दिसायची.
त्यांची साथ सुटली, आता बरीच वर्षं झालीत
मी मात्र मनातल्या विवेकावर हसतो
म्हणतो त्यास, "स्वार्थी झालास बुवा आजकाल!
मित्रांचा भावही तुझ्या ठायी नसतो."
तो म्हणतो, "अरे, मित्र फक्त वळणाशी भेटतात
नव्या दिशा वेधतात मग सोडून जातात,
पोचायचं ठिकाण त्यांनाही ठाऊक नव्हतं
पण खरे मित्रच असा प्रवास करू शकतात."
मी म्हणतो, "इतके काटे सहज झेलले पण
आता मित्रांविना पुढे कसा चालू?
आयुष्याच्या अथांग सागराशी पोचलो,
पण पायातच रूतू लागलीय त्याची वाळू."
विवेक हसतो अन डोळे बंद करतो
मग बराच वेळ डोळे उघडत नाही.
मी मात्र डोळे उघडतो
अन मोबाईलवर मित्रांची नावं बघून आनंदतो.
"हॅप्पी फ्रेण्डशिप डे", म्हणून
सगळ्यांचे मेसेजेस आलेले असतात
माझ्यासारखेच बहुदा, मनविवेकाशी,
तेही मनातल्या मनात भांडलेले असतात...
Sunday, 2 August 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment